पुणे :



पुणेकरांनी खासदार म्हणून मला जबाबदारीने, अपेक्षेने निवडून दिले आहे. खासदार म्हणून नागरिकांच्या संपर्कात राहीन, असा शब्द मी दिला होता. खासदार झाल्यानंतर चौदा जनता दरबार यशस्वीरित्या पार पडले असून मी माझा शब्द पाळला आहे, असे पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी सांगितले. या दरबारांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या एकाच छताखाली सोडवता आल्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोहोळ यांचे चौदावे खासदार जनसंपर्क सेवा अभियान रविवारी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात पार पडले. रास्ता पेठेतील रवींद्र नाईक चौकात झालेल्या या अभियानावेळी खासदार मोहोळ यांच्यासह आमदार सुनील कांबळे, भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख गणेश बीडकर उपस्थित होते. तसेच पुणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस दल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेल्वे, नागरी विमान वाहतूक, सहकार आदी शासकीय यंत्रणांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

















