गावात मागासवर्गीयांसाठी स्मशानभूमी नसल्याने येथील नागरिकांना मरणानंतरही यातना सहन करावे लागत आहेत. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर उघड्यावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तब्बल 15 लिटर पेक्षा अधिक डीझेलचा वापर करावा लागला. ही घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असलेल्या खांडी पिंपळगाव येथील आहे. या घटनेमुळे नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.



याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडी पिंपळगाव येथील पांडुरंग शहाजी भालेराव यांचं सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास निधन झालं. कुटुंबातील सदस्यांनी अंत्यविधीची तयारी केली.मात्र गावात स्मशानभूमी नसल्यामुळे भर पावसात उघड्यावर अंत्यविधी करायचा कसा असा प्रश्न पडला? यातून पर्यायी मार्ग काढत दलित वस्तीच्या शेजारी असलेल्या गायरान जमिनीच्या उघड्या जागेवर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास नातेवाईक पार्थिव घेऊन गायरान जमिनीवर आले. मात्र अंत्यविधी पूर्ण होण्याअगोदर पाऊस आला तर अडचण होईल यामुळे नातेवाईकांनी ताडपत्री आणली. पाऊस लागू नये यासाठी अंत्यसंस्कार करत असताना लाकडे लावून ताडपत्री ठेवण्यात आली. या संपूर्ण अंत्यविधीसाठी नातेवाईकांना १५ लिटरपेक्षा अधिकच डिझेल वापरावं लागलं. या घटनेमुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
जिल्ह्यात २३१ गावांना नाही स्मशानभूमी….
दरम्यान, खुलताबाद येथील या घटनेच्या निमित्ताने जिल्ह्यातील स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा चर्चेसाठी आला. जिल्ह्यातील १३३२ गावांपैकी तब्बल २३१ गावांमध्ये अद्याप पर्यंत स्मशानभूमी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खांडी पिंपळगाव सह स्मशानभूमी नसलेल्या गावांना तात्काळ स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
खांडी पिंपळगाव येथे स्मशानभूमी नाही. यामुळे ज्यांच्याकडे शेती आहे. ते कुटुंब त्यांच्या शेतात अंत्यविधी करतात. मात्र भूमिहीन नसलेल्या दलित मागासवर्गीय कुटुंबांना अंत्यविधीसाठी प्रचंड हाल सहन करावे लागतात. भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश महासत्ता होऊ पाहत आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक नागरिकांना मरण यातना सहन कराव्या लागत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. आमच्या गावात तात्काळ स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण इंगळे यांनी दिला आहे.

















