गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ११ विश्वस्तांविरुद्ध फौजदारी कारवाईची शिफारस

पुणे :

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी सहधर्मादाय आयुक्तांनी गंभीर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. शिवाजीनगर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात रुग्णालयाच्या ११ विश्वस्तांविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

खटल्यात नमूद आहे की, रुग्णालयाने महाराष्ट्र सार्वजनिक ट्रस्ट अधिनियमातील तरतुदींचा भंग केला आहे. विशेषतः, तातडीच्या परिस्थितीत रुग्णाला वैद्यकीय उपचार देणे आणि अनामत रक्कम न मागणे, हे नियम रुग्णालयाने पाळले नाहीत.

घटनेचा तपशील:

ईश्वरी भिसे या गर्भवती महिलेला एप्रिल २०२५ मध्ये तातडीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयाने उपचार सुरू करण्यापूर्वी अनामत रकमेची मागणी केली असल्याचे नातेवाइकांनी आरोप केले. नंतर ईश्वरीला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जावे लागले; उपचारात उशीर झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाने स्वतःहून चौकशी केली. रुग्णालयाच्या नोंदी, वैद्यकीय निर्णय प्रक्रिया, उपचारांचा कालावधी आणि व्यवस्थापनाची भूमिका तपासण्यात आली. चौकशीत सर्व विश्वस्तांचे जबाब नोंदवण्यात आले.

कायद्याचे उल्लंघन:

कलम ४१(अअ) : धर्मादाय रुग्णालयात अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना कमी दरात किंवा मोफत उपचार देणे आवश्यक आहे. उल्लंघन केल्यास २५ हजार रुपये दंड आणि एक वर्षाचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

कलम ६६(ब) : कलम ४१(अअ) उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई लागू होते; गुन्हा सिद्ध झाल्यास एक वर्ष कारावास आणि ५० हजार रुपये दंड होऊ शकतो.

अहवालातील निष्कर्ष:

तातडीच्या रुग्णांना धर्मादाय रुग्णालयाने उपचार देणे आवश्यक आहे, तसेच रुग्ण स्थिर झाल्यानंतर वाहतूक सुविधा पुरवावी आणि अनामत रक्कम मागू नये.

ईश्वरी भिसे यांना उपचार मिळाल्याचे कागदपत्रांवरून सिद्ध होत नाही.

रुग्णालयाचे वर्तन गंभीर स्वरूपाचे असल्याचे निदर्शनास आले.

रुग्णालयाचे मत:

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सांगितले की, रुग्णालयात आलेल्या कोणत्याही रुग्णाला उपचार न करता परत पाठवले जात नाही. डॉक्टरांनी रुग्णाला थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु रुग्ण स्वतः बाहेर गेला. रुग्णालय प्रशासनाने निष्काळजीपणा केला नाही, असा त्यांचा दावा आहे.

आणखी वाचा   हडपसर–मांजरी रस्त्यावर भीषण अपघात

फौजदारी कारवाईच्या आदेशाखालील विश्वस्तांची नावे:

पंडित हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, डॉ. धनंजय केळकर, डॉ. उत्क्रांत कुर्लेकर, डॉ. जितेंद्र क्षीरसागर, विधिज्ञ पी. एम. खिरे, सचिन व्यवहारे, आर. पी. जोशी आणि डॉ. प्रसाद राजहंस.